मुंबई, दि. ३१ :- बुद्धिबळ क्षेत्रात विश्वविजेता स्पर्धेनंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिंपियाड स्पर्धेत रशियाच्या सोबतीनं संयुक्त विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी या दिग्गजांचा सहभाग असलेल्या संघाचं नेतृत्वं महाराष्ट्राच्या विदिथ गुजराथीसारख्या तरुणांन करणं, त्याला दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहार सरीन यांच्या युवा टीमची साथ मिळणं, यातून संयुक्त विजेतेपदाचं हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. भारतीय संघानं मिळवलेल्या यशाचा महाराष्ट्राला आनंद, अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेत्या संघाचं कौतुक केलं आहे. बुद्धीबळाच्या क्षेत्रात भारताची गौरवशाली परंपरा युवा खेळाडू तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत. या विजेत्यापदामुळे येणाऱ्या काळात अनेक युवक बुद्धीबळाकडे प्रोत्साहित होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.